Sunday, December 5, 2010


खुदीराम बोस ( ३ डिसेंबर १८८९ - ११ ऑगस्ट १९०८ )

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करणा-या खुदीराम बोस यांची छबी असलेले भारत सरकारने छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९०

पश्चीम बंगाल मधील मिदनापुर जिल्ह्यात जन्मलेले खुदीराम बोस हे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या क्रांतीकारकांपैकी एक. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी आपल्या देशासाठी सुळावर चढलेल्या खुदीराम बोस यांनी देशातील अनेक तरुणांना स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्याची प्रेरणा दिली.

प्रस्तुत टपाल तिकीट हे त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून प्रकाशीत केले असावे असा माझा कयास आहे.

वंदे मातरम !

डॉ. भीमराव आंबेडकर ( १४ एप्रील १८९१ - ६ डिसेंबर १९५६ )

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची छबी असलेले भारत सरकारने छापलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्षे : १९६६

डॉ. आंबेडकर जनमानसात बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध. कुशाग्र बुध्दिमत्तेला मेहनतीची जोड देउन अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतुन प्रथम वकिली व नंतर डॉक्टरेट मिळवण्यापर्यंत कामगिरी केलेल्या बाबासाहेबांनी पुढे भारतीय राज्यघटनेच्या पायाभारणीत अतिशय मोलाची कामगिरी बजावली. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य हा स्वतंत्र भारताच्या सामाजीक जडणघडणीतला एक मानबिंदु आहे.

Monday, October 11, 2010



जमशेदजी टाटा ( ३ मार्च १८३९ - १९ मे १९०४ )

भारतीय उद्योगविश्वाचे पितामह म्हणुन ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जमशेदजी टाटांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६५

कापडाच्या गिरणीपासून आपल्या औद्योगीक काराकिर्दीची पायाभरणी करणा-या जमशेदजींनी पोलाद, शिक्षण, जलविद्युत आणि जागतिक दर्जाचे हॉटेल या प्रमुख उद्योगांच्या चतु:सुत्री वर भर दिला. त्यापैकी ’ताजमहाल’ हॉटेल चे उद्घाटन त्यांच्या हयातीत १९०३ साली करण्यात आले. पण त्यांनी बघितलेले भव्य स्वप्न आज ’टाटा स्टील’, ’आय.आय.एस.सी.’, ’टी.आय.एफ.आर.’, ’टाटा पॉवर’ च्या रुपाने प्रत्यक्षात उतरलेले आपण बघु शकतो.

प्रस्तुत टपाल तिकीटावर द्रष्ट्या जमशेदजींच्या छबीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या प्रत्यक्षात उतरलेल्या स्वप्नांना विजवाहक तारा व पोलाद उद्योगात लोखंडाचा रस ओतायला वापरली जाणारी सामुग्री यांच्या चित्रांद्वारे प्रातिनिधीक स्वरुपात दाखवण्यात आले आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, October 9, 2010



मेघनाथ साहा ( ६ ऑक्टोबर १८९४ - १६ फेब्रुवारी १९५६ )

भारतीय खगोलशास्त्रन्य मेघनाथ साहा यांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९३

मेघनाथ साहा हे पदार्थविन्यान क्षेत्रातील एक अग्रणी संशोधक. त्यांनी शोधलेले ’साहा समीकरण’ ता-यांच्या अंतरंगातील विविध रासायनिक व भौतीक क्रियांबद्दल माहिती मिळवण्यात उपयुक्त ठरते. त्याचबरोबर त्यांनी अणु तसेच पदार्थविन्यानाच्या शाखेत अनेक विषयांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

याचबरोबर त्यांनी भारताच्या अणु कार्यक्रमाच्या पायाभरणीत मोलाची भुमिका बजावली. बंगालमधील नद्यांच्या पुराच्या समस्येवर तत्कालीन सरकारचे लक्ष वेधून घेण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. एक वैन्यानीक हा कायम समाजापासून व समाजाच्या समस्यांपासून दूर आपल्याच विश्वात वावरतो या सर्वमान्य संकल्पनेला त्यांनी आपल्या वर्तणुकीतुन चुक सिद्ध केले.

त्यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त ह्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले असावे असा माझा अंदाज आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Friday, October 8, 2010


जवाहरलाल नेहरू ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची छबी असलेली अनेक टपाल तिकीटे छापण्यात आली आहेत. त्यातील हे दैनंदिन वापरासाठी छापलेले २५ पैसे किंमतीचे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९७६

लहान मुलांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे चाचा नेहरू ! आजही त्यांचा जन्मदिनबालदिनम्हणून साजरा केला जातो.नेहरूंच्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती नसलेला माणूस सापडणे विरळच. त्यावर लिहिण्यास घेतले तर ब्लॉग छोटा पडेल! नेहरुंनी लिहिलेल्याडिस्कवरी ऑफ इंडियानावच्या पुस्तकावर आधारीतभारत - एक खोजही दूरदर्शन वरील मालिका खुप गाजली.



टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या -मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.


Saturday, September 25, 2010


अब्राहम लिंकन ( १२ फेब्रुवारी १८०९ - १५ अप्रील १८६५ )

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६५

अब्राहम लिंकन यांनी १८६१ ते १८६५ अशी ४ वर्षे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भुषविले. त्यांच्या काराकिर्दीत त्यांना अमेरिकन नागरी युद्ध, गुलामगिरीविरुद्धचा लढा अश्या देशांतर्गत व गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. अमेरिकेच्या इतिहासातील महान राष्ट्राध्याक्षांमध्ये त्यांची गणना होते यातच त्यांच्या कार्याचा आवाका दिसुन येतो. नागरी युद्धाच्या समाप्तीनंतर ६ दिवसांतच त्यांच्यावर खूनी हल्ला करण्यात आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

१९६५ साली त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारने हे तिकीट छापले असावे असा माझा कयास आहे.


टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या -मेल ( sameercbhide@gmail.com ) संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, September 21, 2010


जवाहरलाल नेहरु ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

जवाहरलाल नेहरु निधन - दुखवटा - १९६४

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची छबी असलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६४

पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि अवघ्या देशावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर १२ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला.

वर दर्शविलेल्या टपाल तिकीटावर जवाहरलाल नेहरु यांच्या छबी सही बरोबरच पार्श्वभुमीवर मोठा जनसमुदाय आढळतो. हा जनसमुदाय त्यांच्या निधनानंतर शोकाकूल अवस्थेत जमलेल्या नागरिकांचा असावा असा कयास आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या -मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, September 18, 2010


महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

भारत - दक्षीण अफ्रीका सहयोग - १९९५

महात्मा गांधींची चिरपरिचीत छबी तर सर्वांच्याच डोळ्यासमोर आहे, परंतु त्यांची तरुणपणीची छबी घेउन भारत सरकारने ’भारत - दक्षीण अफ्रीका सहयोग’ या शिर्षकाखाली छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९५

महात्मा गांधींनी वकिलीचे शिक्षण दक्षीण अफ्रीकेत घेतले. तेथील वर्णद्वेशाविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्यातच त्यांच्या भारतीय राजकारणातील भावी वाटचालीची बीजे रोवली गेली.

भारत आणि दक्षीण अफ्रीका या देशांनी १९९५ साली ’विन्यान आणि तंत्रन्यान’ विषयक सहयोग देण्यासंबंधी करार केला व त्या कराराच्या गौरवार्थ भारत सरकारने २ टपाल तिकीटे छापली, त्यापैकीच हे एक.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Friday, August 27, 2010


सुभाषचंद्र बोस ( २३ जानेवारी १८९७ - १८ ऑगस्ट १९४५ )


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील तळपता सुर्य म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस! नेताजींची छबी असलेले दैनंदिन वापरासाठी भारत सरकारने छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : २००१


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व तितकेच स्फुर्तीदायक व्यक्तिमत्व. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद दोन वेळा भुषविल्यानंतर महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्य मिळवण्याच्या पद्धतीवरुन झालेल्या तात्वीक मतभेदांमुळे सुभाषबाबुंनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला व ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा पक्ष स्थापन केला. संपुर्ण स्वराज्य व त्यासाठी गरज पडल्यास हिंसेचा मार्ग पत्करण्याची तयारी या त्यांच्या क्रांतीकारी धोरणातच त्यांचे द्रष्टेपण दिसुन येते.


दुस-या महायुद्धाच्या वेळी कोंडीत सापडलेल्या इंग्रजांना त्यांच्या शत्रुंची मदत घेउन पुरत नामोहरम कराव व देश स्वतंत्र करावा या विचारांनी प्रेरीत होवुन त्यांनी हिटलर ची भेट घेतली व जर्मनीची या प्रकरणी काही मदत होवु शकते का याची चाचपणी केली. त्यानंतर त्यांनी जपानमधील भारतीय युद्धकैद्यांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले व ’आझाद हिंद सेना’ उभारली. जपानी सैन्याच्या मदतीने त्यांनी अंदमान, निकोबार बेटांना इंग्रजांच्या जोखडातून मुक्त
केले. भारताच्या इशान्य सीमेवरुन मुसंडी मारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभली नाही व प्रतिकूल परिस्थीतीमुळे ही मोहीम पुर्णत्वाला जाउ शकली नाही. पण त्यांच्या "चलो दिल्ली" या घोषणेमुळे अवघ्या भारतात चैतन्य पसरले यात शंकाच नाही.

अशा या थोर लढवय्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी व गूढ अशा विमान अपघातात झाला. परंतु या विषयावर अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

माझ्या बाबतीत म्हणाल तर स्वातंत्र्यलक्ष्मीच्या चरणी आपल्या आयुष्याची ओवाळणी घालणा-या नेताजींचे नाव उच्चारताच "तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा" अशा आवेशपुर्ण गर्जना ऐकु येतात आणि मन म्हणू लागत "कदम कदम बढाए जा .. खुशी के गीत गाए जा .. ये जिंदगी है कौम की तु कौम पे लुटाए जा .."

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. विनायक देशपांडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.



महादेव देसाई ( १ जानेवारी १८९२ - १५ ऑगस्ट १९४२ )

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९८३

महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक व भारताच्या स्वातंत्र्यासंग्रामातील एक लढवय्ये महादेव देसाई यांच्या स्मृतीत भारत सरकारने छापलेले ५० पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

देसाईंनी स्वातंत्र्यपुर्व काळात महात्मा गांधी संपादक असलेल्या वृत्तपत्रातून लिखाणही केले. त्यांनी अहिंसेच्या सुत्रावर तसेच महात्मा गांधींच्या सहवासातील आठवणींवर लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. १५ ऑगस्ट १९४२ साली वयाच्या ५०व्या यावर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.
लाल बहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६)

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६६

'मुर्ती लहान पण किर्ती महान' अश्या शब्दांत गौरविले जाणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची छबी असलेले १५ पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होण्यापुर्वी भारताच्या रेलवेमंत्री पदावर होते. ते रेलवेमंत्री पदावर असताना १९५६ साली झालेल्या एका रेलवे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी पदाचा राजीनामा देऊ केला होता. राजकारणातील नैतिक अधिष्ठान अधोरेखीत करणारी ही घटना भारतीय आजही विसरु शकलेले नाहीत.

नेहरुंच्या निधनानंतर १९६४ साली शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या पंतप्रधान पदावरच्या लहान काराकिर्दीत त्यांना देशापुढील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. अन्नधान्याची टंचाई तसेच पाकिस्तान बरोबरचे युद्ध ही त्यातील काही ठळक आव्हाने. त्यांनी दिलेला 'जय जवान जय किसान' हा नारा लोकप्रिय ठरला. भारताने युद्ध तर जिंकलेच शिवाय अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरलेल्या हरितक्रांतीच्या दिशेने पहिले पाउलही टाकले.

युद्ध जिंकल्यानंतर रशियातील ताश्कंद येथे युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षरी केल्याच्या दुस-याच दिवशी त्यांचे निधन झाले व भारत एक सच्च्या राजकारण्याला मुकला. शास्त्रीजींच्या अकाली निधनामागे असलेले रहस्य अजुनही उलगडलेले नाही.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

जेरोम डीसूजा ( ६ ऑगस्ट १८९७ - १२ ऑगस्ट १९७७ )


जेरोम डीसूजा यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त भारत सरकारने छापलेले २ रुपये किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९७

जेरोम डिसुजा हे भारतातील एक विख्यात ख्रिस्ती ’बिशप’. त्याचबरोबर एक विद्वान व लेखक म्हणुनही प्रसिद्ध. भारतीय चर्चवरील ’बिशप’ नेमणूकीत पोर्तुगलला असणा-या अधिकाराबद्दल व्हॅटीकनबरोबरच्या वाटाघाटींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर भारतातील फ्रेंच वसाहतिंच्या शांततामय माघारीतही त्यांनी केलेल्या वाटाघाटींचा मोलाचा वाटा होता. युनोच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत भारताचे प्रतिनिधी म्हणून जेरोम डिसुझांची नियुक्ती करण्यात आली होती.


टीप : ब्लॉगवाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले, तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Thursday, August 26, 2010



महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची छबी असलेले भारत सरकारने दैनंदिन वापरासाठी छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९१

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Monday, August 16, 2010

जे.आर.डी. टाटा ( २९ जुलै १९०४ - २९ नोव्हेंबर १९९३ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील १५ रुपये किमतीचे जे.आर.डी. टाटा यांची छबी असलेले हे तिकीट.
जे.आर.डी. टाटा म्हणजेच जहांगीर टाटा भारतातील नागरी उड्डयन क्षेत्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी , ’टाटा एअरलाईन्स’ या भारतातील पहिल्या व्यावसायीक विमान सेवेची सुरुवात १९३२ साली करण्यात आली. १९४६ साली ह्या ’टाटा एअरलाईन्स’ चे आत्ताच्या ’इंडीयन एअरलाईन्स’ मध्ये रुपांतर करण्यात आले!

पोलाद, अभियांत्रीकी, उर्जा, रसायने या क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये अग्रणी असलेल्या व भारताच्या आर्थीक विकासात मोलाची भुमिका बजावणा-या ’टाटा ग्रूप’ चे प्रमुख या नात्याने जे.आर.डींचे योगदान अतुलनीय आहे.
त्यांना भारत सरकारने १९५७ साली पद्मविभुषण पुरस्काराने तर १९९२ साली भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ’भारतरत्न’ ने गौरवले.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, August 7, 2010


मदर टेरेसा ( २६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७ )

मदर टेरेसा यांची छ्बी असलेले ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाल तिकीट मालिकेतील हे २० रुपये किमतीचे टपाल तिकीट.

मदर टेरेसा या एक अल्बानियन वंशाच्या परंतु भारताचे नागरिकत्व पत्करलेल्या थोर समाजसेविका. गरिब, निराधार आणि अनाथांसाठी त्यांनी चालवलेल्या कार्याची महती संपुर्ण जगभर पसरली. १९७९ साली त्यांना ’नोबेल शांतता पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले. १९८० साली त्यांना भारत सरकारने ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. त्यांनी कलकत्त्यात स्थापन केलेल्या ’मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेच्या आजघडीला १२३ देशांमध्ये शाखा असुन मदर टेरेसांनी घालून दिलेला मानवतावादाचा वसा त्या चालवत आहेत.

२०१० साली त्यांची जन्मशताब्दी असुन अमेरिकन टपाल खाते देखील त्यांची छबी असलेले टपाल तिकीट प्रकाशीत करणार आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, August 3, 2010


होमी जहांगीर भाभा ( ३० ऑक्टोबर १९०९ - २४ जानेवारी १९६६ )

भारताच्या आण्वीक कार्यक्रमाचे पितामह होमी जहांगीर भाभा यांची छबी असलेले हे ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाल तिकीट मालिकेतील ४ रुपये किमतीचे तिकीट.

टी.आय.एफ.आर. (टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च ) या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक असलेले होमी भाभा अणुउर्जेच्या शांततामय वापरासाठी आग्रही होते. या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. भाभांचे नाव देउन गौरवली गेलेली ’भाभा अ‍ॅटॉमीक रिसर्च सेंटर’ ही संस्था अणुउर्जेच्या क्षेत्रात भरीव योगदान देते आहे.

होमी भाभांना भारत सरकारने १९५४ साली पद्मभुषण ह्या पुरस्काराने गौरवले. अशा या महान वैन्यानीकाचा १९६६ साली एका विमान अपघातात मृत्यु झाला.

ऋणनिर्देश
हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. सेल्वाराज मणी
२. श्री. चंद्रशेखर भिडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, July 31, 2010


राजीव गांधी ( २० ऑगस्ट १९४४ - २१ मे १९९१ )

इंदिरा गांधींचे सुपुत्र व भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची छबी असलेले हे’भारताचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाला तिकीट मालिकेतील ५ रुपये किमतीचे तिकीट.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारताच्या पंतप्रधानपदाची सुत्रे राजीव गांधींकडे गेली. राजीव गांधी भारताला लाभलेले सर्वात तरुण पंतप्रधान ! राजीव गांधी हे ’इंडीयन एअरलाईन्स’ चे एक प्रशिक्षीत ’पायलट’ होते!

त्यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. संगणक, दुरध्वनी या आता सहजसाध्य असणा-या गोष्टी लोकांच्या वापरात येण्यास राजीव गांधींची दुरदृष्टी कारणीभूत ठरली. पण त्यांची काराकिर्द ’बोफोर्स तोफ घोटाळा’ आणि श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठविण्याच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरली. या धोरणाचा विरोध म्हणून २१ मे १९९१ रोजी ’श्री पेरुंबुदूर’ येथील त्यांच्या सभेत तमीळ बंडखोर संघटना ’लिट्टे’ ने संहारक मानवी बॉम्बस्फोट घडवुन आणला व राजीव गांधींची हत्या केली.
ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ
२. श्री. निशांत राज

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Monday, July 26, 2010


महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

महात्मा गांधींची अनेक टपाल तिकीटे भारतीय टपाल खात्याने छापली आहेत. त्यातील ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे १ रुपया किमतीचे तिकीट.

महात्मा गांधींविषयी ऐकले नसेल वा माहिती नसेल असा एकही मनुष्य भारतात सापडणे शक्य नाही!महात्मा गांधींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ’अहिंसेचे पर्व’ गांधीपर्व म्हणूनच ओळखले जाते.भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्यापुर्वी त्यांनी दक्षिण अफ्रीकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. अहिंसा हा शब्द उच्चारल्या बरोबर डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजे महात्मा गांधी! त्यांनी दिलेला शांततेचा संदेश केवळ भारत देशातच नव्हे तर संपुर्ण जगात एक प्रेरणादायी विचार ठरला आहे.

टपाल तिकीटांबद्दल लिहीत असल्यामुळेच अजुन एक गोष्ट उद्धृत कराविशी वाटते. भारतीय टपाल खात्याच्या ’वेबसाईट’ वर ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. गांधीजींच्या मते टपाल तिकीटे जमवण्याचा छंद हा सर्व छंदांचा राजा ! लहान लहान मुलांनी चांगली काम केली की गांधीजी त्यांना आलेल्या पत्रांवरची टपाल तिकीट मुलांना बक्षीस म्हणून द्यायचे!

अशा या थोर नेत्याची ३० जानेवारी १९४८ रोजी म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या ५ महिन्यात नथूराम गोडसे यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेवरील ’मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे मराठी रंगभुमीवरील नाटक प्रचंड वादग्रस्त व नंतर तितकेच लोकप्रिय ठरले.

Wednesday, July 21, 2010


सत्यजीत रे ( २ मे १९२१ - २३ एप्रील १९९२ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील ३ रुपये किमतीचे सत्यजीत रे यांची छबी असलेले हे तिकीट.

सत्यजीत रे हे एक जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक. त्यांची पहिली कलाकृती ’पथेर पांचाली’ अजरामर ठरली. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ३२ राष्ट्रीय सिने पुरस्कार पटकावले आहेत. १९८५ साली त्यांना प्रतिष्ठेचा ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ’भारतरत्न’ ने सुद्धा सन्मानीत करण्यात आले आहे.

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, July 20, 2010


पेरियार इरोड वेंकटा रामसामि ( १७ सप्टेंबर १८७९ - २४ डिसेंबर १९७३ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील ५० पैसे किमतीचे हे तिकीट.

रामसामि हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध आणि थोर समाजसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध पुकारलेला लढा, स्त्री स्वातंत्र्याचा केलेला पुरस्कार ही त्यांच्या पुरोगामीत्वाची साक्ष देणारी काही महान कार्ये. द्रविड कळघम या राजकीय पक्षाचे संस्थापक. हिंदी भाषेचे कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध. हिंदी भाषेचे शिक्षण दक्षिण भारतीयांवर लादण्यास प्रखर विरोध व हा आर्यांचा द्रविडांवर कुरघोडी करण्याचा डाव असल्याचा आरोप.

ऋणनिर्देश
हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Monday, July 19, 2010


चंद्रशेखर वेंकट रामन ( ७ नोव्हेंबर १८८८ - २१ नोव्हेंबर १९७० )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे १० रुपये किंमत असलेले तिकीट.

प्रकाशाच्या संदर्भात प्रचलीत असलेल्या ’रामन इफेक्ट’ चे संशोधक. १९३० सालचा भौतिकशास्त्राच नोबेल पुरस्कार मिळवणारे जागतिक किर्तीचे भारतीय शास्त्रन्य. प्रकाश हा लहरींचा बनलाय त्याचप्रमाणे कणांचा सुद्धा बनलाय हा महत्वाचा सिद्धांत रामन यांच्या संशोधनामुळे अधिक प्रबळ झाला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची पावती म्हणुन त्यांना ’सर’ ही पदवी बहाल केली. भारत सरकारने १९५४ साली भारतरत्न पारितोषीकाने त्यांचा सन्मान केला.

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. अनंता पुरेकर
२. सौ. शिल्पा भिडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Friday, July 16, 2010


इंदिरा गांधी ( १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ ऑक्टोबर १९८४ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे ५ रुपये किंमत असलेले तिकीट.

स्वतंत्र भारताला लाभलेली एकमेव महिला पंतप्रधान. एकूण १५ वर्षे पंतप्रधानपदी राहिलेल्या इंदिरा गांधी जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या महिला आहेत!

जवाहरलाल नेहरुंच्या सुकन्या इंदिराजी आपल्या कणखर निर्णयक्षमतेबद्दल प्रसिद्ध होत्या. १९७१ च्या पाकिस्तान युध्दाच्या वेळी त्यांनी दाखवलेला मानसिक कणखरपणा आजही जागतिक राजकारणात कौतुकाचा विषय आहे. त्यांनी दिलेला ’गरिबी हटाओ’ चा नारा भलताच प्रसिद्ध ठरला. पण त्यांनी देशावर लादलेली ’आणीबाणी’ हा तितकाच वादाचा विषय ठरला. ऑपरेशन ’ब्ल्यू स्टार’ च्या वादग्रस्त निर्णयाचा परिपाक म्हणून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि भारताच्या राजकीय इतिहासातील एक वादळी व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाले.

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Thursday, July 15, 2010


डॉ. भीमराव आंबेडकर ( १४ एप्रील १८९१ - ६ डिसेंबर १९५६ )

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची छबी असलेली अनेक टपाल तिकीटे छापण्यात आली आहेत. त्यातील हे सर्वात नवे तिकीट. ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील २ रुपये किमतीचे हे तिकीट.


ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !
१. श्री. निशांत राज
टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Wednesday, July 14, 2010


जवाहरलाल नेहरू ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची छबी असलेली अनेक टपाल तिकीटे छापण्यात आली आहेत. त्यातील हे सर्वात नवे तिकीट. ’राष्ट्राचे शिल्पकार’ (Nation Builders) या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे २५ पैसे किंमत असलेले तिकीट.

लहान मुलांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे चाचा नेहरू ! आजही त्यांचा जन्मदिन ’बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.नेहरूंच्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती नसलेला माणूस सापडणे विरळच. त्यावर लिहिण्यास घेतले तर ब्लॉग छोटा पडेल! नेहरुंनी लिहिलेल्या ’डिस्कवरी ऑफ इंडिया’ नावच्या पुस्तकावर आधारीत ’भारत - एक खोज’ ही दूरदर्शन वरील मालिका खुप गाजली.


ऋणनिर्देश
हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ
२. श्री. चंद्रशेखर भिडे

[टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.]